अहमदनगर : सशस्त्र सेना ध्वजदिन 2014 साठी केंद्र शासनाकडून राज्यास 26 कोटी 27 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात राज्य शासन...
अहमदनगर : सशस्त्र सेना ध्वजदिन 2014 साठी केंद्र शासनाकडून राज्यास 26 कोटी 27 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्यास 1 कोटी 43 लाखांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने इष्टांकापेक्षा अधिक निधी म्हणजे 1 कोटी 44 लाख 43 हजाराचा निधी संकलीत करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या विशेष कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार (निवृत्त) यांना स्मृती चिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ध्वजदिन 2015 निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम अहमदनगर येथील महासैनिक संकुल सभागृहात संपन्न झाला. यावेळी शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लक्ष्मण पोले, माजी कर्नल आनंद सौरभ, श्री. कि.अ. काशिद, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीत आदी उपस्थित होते.
यावेळी मागदर्शन करतांना जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले, सैनिक हा शिस्तबद्ध जीवन जगणारा असतो. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर गावात एक आदर्श निर्माण करावा आणि समाजाने त्यांचे अनुकरण करावे. देशासाठी सीमेवर सशस्त्र सेना ही महत्त्वाची कामगिरी बजावत असते. त्यामुळेच आज आपण शांततेने जीवन जगत आहोत. त्यांच्या कुटुंबाप्रती आपली नैतिक जबाबदारी आहे. या ध्वजदिन संकलन निधीच्या माध्यमातून उपकाराची परतफेड करण्याची संधी आम्हाला लाभली आहे. आपण सर्वजण ती नक्की पूर्ण कराल अशी मला खात्री आहे. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, प्रसन्नता आणण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी आपले आचार व विचारात संपन्नता निर्माण करण्याची गरज आहे. दृष्ट विचारांमुळे समाजाची अधोगती होत आहे. प्रामाणिकपणा कमी होत आहे. खोटेपणा बळावत आहे. कुटुंबातील सुसंवाद कमी झाल्यामुळे मनुष्य आपल्या कुटुंबापासून दूर जात आहे. हे संपविण्यासाठी माणसाने समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसांबद्दल सहानुभूती बाळगली पाहिजे. कुटुंबात सुसंवाद ठेवून गुणवत्तेत वाढ केली पाहिजे हीच खरी मानव सेवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना 2 मिनिटे मौनधारण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिक/विधवा पत्नी त्यांच्या पाल्यांना कल्याणकारी निधीतून गौरव पुरस्कार प्रित्यर्थ धनादेश वितरण करण्यात आले. यामध्ये सन 2014-15 मध्ये इयत्ता 10 वी परिक्षेत 94.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कु.प्राप्ती पांडूरंग बागल व कु.प्रियंका राजू शिंदे तर क्रीडा क्षेत्रात (कुस्ती) विशेष प्राविण्य मिळविलेल्या विशाल सुदाम आढाव यांचा कुटुंबासह शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व 10 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गतवर्षी ध्वजदिन निधी संकलनात जास्तीत जास्त निधी संकलन केल्याबद्दल शिर्डी संस्थान, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, तहसिल कार्यालय नगर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अहमदनगर, नगर उप विभागीय कार्यालय, राहुरी, श्रीरामपूर व संगमनेर येथील गट विकास अधिकारी कार्यालयातून आलेल्या प्रतिनिधींचा व बँक ऑफ महाराष्ट्र आणि विविध संस्थेतून आलेल्या प्रतिनिधींचा भेट वस्तू, प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तर 6 माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना गौरव पुरस्कार प्रित्यर्थ धनादेश वितरीत करण्यात आले. तर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातून स्वयंरोजगार, मुलींचा विवाह, व्यवसायिक शिक्षण, महाविद्यालयीन, शालेय शिक्षण, शिष्यवृत्ती, अत्यंविधी, वसतीगृह खर्च, महाराष्ट्र राज्य परिवहन बस प्रवास, तातडीची मदत यासाठी निवडक लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मेजर मिलींद तुंगार (निवृत्त) यांनी सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचे महत्त्व विशद केले. माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा व लाभांची माहिती दिली. तसचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन ध्वजदिन 2015 निधी संकलनाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल बागुल यांनी तर आभार सईद अहमद यांनी केले. कार्यक्रमास माजी सैनिक / व त्यांचे पाल्य संख्येने उपस्थित होते.










