अहमदनगर जिल्ह्यातील शनीशिंगणापूर येथे महिलांना चौथ-यावर प्रवेश, हा म्हटलं तर वादाचा आणि म्हटलं तर विचारांना गती देणारा विषय झाला आहे. याच...
अहमदनगर जिल्ह्यातील शनीशिंगणापूर येथे महिलांना चौथ-यावर प्रवेश, हा म्हटलं तर वादाचा आणि म्हटलं तर विचारांना गती देणारा विषय झाला आहे. याच जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शनी मंदिर, स्त्री-पुरुष अशा सर्वांनाच सर्वकाळ खुले असते. या पार्श्वभूमीवर शिंगणापूर येथेच महिलांना प्रवेश बंदी का? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर, चार-पाचशे वर्षांची परंपरा असे उत्तर दिले जाते. फार नाही, पण चाळीस- पन्नास वर्षापूर्वीचे हेच शनी मंदिर ज्यांना आठवत असेल, त्यांनी आठवावे. तो चौथरा, ते एकतारी तुटके कुंपण, ती विहीर, भोवतालचा गावकचरा, वराह अन् भटक्या कुत्र्यांचे जत्थे. अभावानेच फुल विक्री करणारा एखादा पोटभरू. लोटाभर पाणी आणि ओंजळभर फुल दोन चमचे तेल, कधी वीस पैसे कधी चार आणे एकदा तीस पस्तीस पैसेही मिळायचे. आज परिस्थिती बदलली. आता शनीशिंगणापूर प्रसिद्ध देवस्थानच्या जागतिक यादीत आहे. त्यासोबत आलेला शोभिवंतपणा, व्यवसाय, रुढी-परंपरेतील अन्य बदल, पुजा-अर्चना, नियमित भक्ती, विशिष्ट वेळी व दिवशी विशिष्ठ पूजन, हेही बदल स्वीकारलेच गेले. गावाचं रुप बदलले, पिढी बदलली. या गावात चोरी झाली तर चोरी करणारा आंधळा होती हे चोरांनीच खोटं ठरवून दाखवलं. दरम्यान अनेक देवस्थानात कधी लिंग भेद, कधी जाती भेद, यावरून मंदिरातील निषिद्ध प्रवेशही सन्मानीय झाले. परंतु शनीशिंगणापूरात शनीचे महिलांना चौथ-यावरचे दर्शन परंपरेच्या सोवळ्यातच अडकले. नुकतेच एक तरुणीने चौथ-यावर जावून शनी देवाला स्पर्श करून दर्शन घेतले आणि चर्चा-वाद- विरोध- समर्थन असं जंजाळ निर्माण झाले. परिणामी समानतेच्या मुद्द्यावर पुण्याच्या भूमाता संघटनेच्या महिलांनी सामुहिकरित्या जाऊन शनीचे दर्शन घेण्याचा निर्धार केला. त्यास विरोधी भूमिकांनी अटकाव केला. त्यावर क्रिया-प्रतिक्रिया, विरोध आणि समर्थन अधिक उग्र झाले. कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश बंदी असू नये, असे अखिल भारतीय आखाडा परिषद म्हणते. महिलांनी पूजा-अर्चना केल्यास देवाला आनंदच होईल, असं अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर म्हणतात. ज्ञान व मंदिराची दारे सर्वांसाठी खुली असली पाहिजेत असे काँग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी म्हणतात. सोशल मिडायामध्ये अवघ्या दोन तासात ६ हजार टिवट झाले व महिला प्रवेश बंदी उठविण्याची मागणी झाल्याचे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तर स्त्री-पुरुष भेदभाव करू नये, वाद मिटविण्यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थानने पुढाकार घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुळात धर्म-संस्कृती प्रवाही असावी,काळानुरूप बदल असलेच पाहिजेत. हे एकिकडे मान्य केले जात असतांना, शेकडो वर्षांची प्रथा जपायचीच का? असा काही जणांचा सूर आहे. प्रगती प्रगती म्हणायची ती नेमकी कशाला? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कोणतीही गोष्ट अधिक ताणली तर तुटते. इथे प्रश्न समाजमनाचा आहे. समाज या संकल्पनेत लिंगभेद येत नाही, असे असता स्त्री-पुरुष भेद हा समाजमनाच्या सुखाचा विषय आहे. का? याचेही उत्तर शोधले गेले पाहिजे. एका तरुणीने शनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतले. त्यातून विश्वस्थांमध्ये महिलेचा सहभाग, हा विषय पुढे आला. महिलांचा सहभाग नसलेले विश्वस्थ आजवर होते. ती परंपरा मोडीत काढून यंदा महिलांचा समावेश विश्वस्थांमध्ये केला गेला. इतकेच नव्हे तर विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदही महिलेला दिले गेले. इथे जुनी परंपरा मोडीत काढलीच ना? हे का घडले? जर ती तरुणी चौथ-यावर गेलीच नसती, तर विश्वस्त मंडळात महिलांचा सहभाग झाला असता का? याचेही उत्तर दिले गेले पाहिजे. प्रगल्भता, प्रश्न निर्माण करण्यात नव्हे तर प्रश्नांना उत्तरे मिळविण्यात असते. हे कोणी कोणास शिकवावे असे आहे का? या सर्व गदारोळात शनीचे काय? एरवी शनीची पिडा, शनीची साडेसाती याशिवाय शनी न आठवणा-यांनी शनीलाच तर पिडा होत नसेल ना? याचाही विचार करावा मुख्यमंत्री म्हणतात तेच बरोबर आहे. लिंगभेद होऊच नये. प्रशासन व देवस्थान यांनी समोपचाराने उत्तर शोधावे. आज स्त्री-पुरुष हा विषय चर्चिला जातो, उद्या जी व्यक्ती पूर्ण स्त्री-अथवा पुरुष नाही त्यांचा प्रश्न निर्माण झाला तर? याचेही चर्चेच्या वेळी भान ठेवावे लागेल हे निश्चित.










