अहमदनगर : प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापनदिनी अहमदनगर येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री प्रा....
![]() |
अहमदनगर : प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापनदिनी अहमदनगर येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदि उपस्थित होते.
पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये कृषिप्रधान अर्थव्यवस्था विचारात घेवून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 279 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. त्यामुळे साधारणपणे 38 हजार टीसीएम पाणीसाठा विकेंद्रीत स्वरुपात निर्माण झाला. या पाण्याचा उपयोग यावर्षी तसेच पुढे येणाऱ्या वर्षामध्ये चांगल्या प्रकारे होईल, असा मला विश्वास वाटतो. सन 2016-17 या वर्षासाठी 264 गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारण व मृदसंधारण कामांची जनतेच्या सहभागातून परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल. पिण्याला पाणी आणि जनावरांना चारा याचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात येत असून 105 गावे, 555 वाड्या-वस्त्यांना 146 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
महसूल हा प्रशासनाचा कणा आहे. सर्वसामान्य नागरिकांचा या विभागाशी नेहमीच संबंध येतो. जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये ऑनलाईन सात-बाराद्वारे कामकाज चालू करण्यात आले आहे. तसेच रेकॉर्ड स्कॅनिंग बाबत राज्यातील पहिला प्रकल्प जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेला आहे. जनसामान्याच्या दृष्टिकोनातून जिव्हाळ्याच्या असलेल्या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी नियमित प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील 93 शाळा आयएसओ प्रमाणित झाल्या आहेत. ही जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील अभिनंदनीय बाब ठरली आहे. या निमित्ताने या क्षेत्रातील संबंधित घटकांचे मी अभिनंदन करतो. जिल्ह्यामध्ये उद्योगांना स्थापन करण्यामध्ये सुलभता यावी यादृष्टिने सुलभीकरणासाठी समिती तयार करण्यात आली असून याद्वारे जिल्ह्याचे औद्योगिकीकरण व व्यवसाय वृद्धीमध्ये सुलभीकरण येईल, असा, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मनुष्यबळाचे विविध प्रकारचे कौशल्य विकसित होण्यासाठी जिल्ह्यामध्ये 17 व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणजेच व्हीटीपीमार्फत प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून त्यामुळे रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळणार आहे. छोट्या व मध्यम व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीचा लाभ व्हावा यासाठी मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे 10 हजार लाभार्थ्यांना 81 कोटी 45 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. जनसामान्यांच्या जीविताची हमी या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना या योजनांना जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुढील काळामध्ये अटल पेन्शन योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होईल, यादृष्टिने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा भारताचे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देवून सत्कार करण्यात आला.
पौर्णिमा अजय शिंदे, गणेश निवृत्ती पवार यांना गुणवंत खेळाडू तर गुणवंत क्रीडा मागदर्शक म्हणून अभिजित आनंदा दळवी, बळीराम किसन सातपुते यांचाही सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्रामार्फत जिल्ह्यात युवा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व भारत सरकारचे कौशल्य विकास दिन, योग दिन, स्टार्टअप इंडिया, मतदार जागृती दिन आदी वेगवेगळे कार्यक्रम साजरे करणारे युवा मंडळ, जय युवा ॲकेडमी यांचा 25 हजार रूपये, धनादेश, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समारंभाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह जि.प.अध्यक्षा मंजुषाताई गुंड, महापौर अभिषेक कळमकर, जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जि.प. समाजकल्याण सभापती मिराताई चकोर, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपविभागीय अधिकारी वामन कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन फिरोदिया हायस्कूलच्या शिक्षीका गितांजली भावे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर रसावेडी येथील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला तहसीलदार सुधीर पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक संचालक ब्रिजेश निमगांवकर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आदी उपस्थित होते.
|










