काल पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे 130 विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आले होते. ...
काल पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे 130 विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर काही मुले समुद्रात उतरले होते. सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांसोबत अकरा शिक्षक व काही कर्मचारी देखील होते. समुद्रात चेष्टा-मस्करी करीत जवळपास वीस विद्यार्थी उतरले होते. नेमका हा दिवस ओहोटीचा असल्याने हे विद्यार्थी समुद्रात खेचले गेले. सर्व काही डोळ्यासमोर घडत असतांना काहीही करण्यास उर्वरीत सर्वचजण असमर्थ होते. तरीही स्वयंसेवी तट रक्षक दल व ग्रामस्थांच्या सहकार्याने सहा जणांना वाचविण्यात यश आले तर दहा विद्यार्थिनी तीन विद्यार्थी यांचे मृतदेह जीवरक्षक दलाच्या हाती लागले. एक विद्यार्थ्यांचा मृत देह उशिराने सापडला. या एकूण प्रसंगात जीवरक्षक, तटरक्षक, चेतक व सी किंग हेलीकॉप्टर, ग्रामस्थ अशा सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न केले. पुण्यात ही घटना समजल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी व दहा रुग्णवाहिकांचा ताफा घटनास्थळी गेला होता. जे घडले ते करुणाजनक आणि दुर्देवी होते. अशा प्रकारे घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. 6 जुलै 2014 रोजी अलिबाग समुद्रकिनारी मुंबईतील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. 13 सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील घटनांमध्ये सहा बळी गेले होते. 2015 च्या 26 सप्टेंबर रोजी गुहागर समुद्रकिना-यावर शेख कुटुंबातील 7 जण मृत्यू पावले होते. 27 सप्टेंबर रोजी देवबाग समुद्रकिनारी बेळगावच्या दोन बहिणींचा मृत्यू झाला होता. हे प्रकार म्हणजे केवळ संबंधीत कुटुंबाच्याच दुःखाचा विषय नाही. तर त्यांचे गाव, शिक्षणसंस्था किंवा परिसर इतकेच नव्हे तर राष्ट्रीय संतती व संपत्तीच्या नुकसानीचा अन् शोकाचा विषय आहे. बातमी समजल्यानंतर ज्या कोणाचे मन हेलावेल त्यांच्या भावनांचा विषय आहे तर अशा घटना घडल्यावर सर्व प्रथम रोष व्यक्त होतो, तो प्रशासनावर. पण प्रत्येकवेळी प्रशासनच जबाबदार असते का? हा चिंतनाचाच भाग आहे. निश्चितपणाने आपलीही काही जबाबदारी असतेच ना? प्रस्तुत घटनेतही उपस्थित ग्रामस्थ. विक्रेते, तटरक्षक यांनी मुलांना रोखत किना-याच्या धोकेदायक जागांची कल्पना दिली होती. शिवाय प्रस्तुत ठिकाणी सुचनांचे फलकही आहेत. त्याशिवाय महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारीही सोबत होते. तरीही ही घटना घडली. कोणीच त्यांचे प्रबोधन केले नाही की, मुलांनी त्यांचे ऐकले नाही? हाही विषय महत्त्वाचा ठरतो. तारुण्य, उत्साह, नवलाईचे आकर्षण हे एकदम मान्य. परंतु संयम, आज्ञाधारकपणा, विवेक या गोष्टींनाही महत्त्व आहेच. वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांचा, पर्यटकांचा जाणारा जीव ही दुःखाची व चिंतेचीच बाब आहे. परंतु थोडीशी सजगता, थोडा आज्ञाधारकपणा आणि थोडासा संयम हा अशा प्रसंगी महत्त्वाचा ठरतो. राहिला प्रश्न प्रशासनाचा तर प्रशासनानेही सक्तीने काही नियम व उपाययोजना अवलंबिने इथे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन पर्यटन ठिकाणी फारसे प्रभावी ठरत नाही. हा अनुभव आहे. तेव्हा अशा कामी त्यांना सशक्त करण्याचे काम वरिष्ठ प्रशासनाने करने हे अगत्याचे ठरते. काही समुद्रकिनारी तटबंदी करणे व्यावसायिकदृष्ट्या अडचणीचे ठरते. कारण त्या स्थानिक गावचे मच्छिमार त्या ठिकाणी मच्छिमारीचा व्यवसाय करतात. ते त्यांचे पर्यायाने गावाचे उत्पन्न आहे. अशा ठिकाणी पर्यटनास हे क्षेत्र बाधित कसे करावे हा प्रशासनाचा प्रश्न आहे. यावर तज्ञांनी विचार करून उपाय सुचवायला हरकत नाही. धोक्याच्या जागा, भरती- ओहटीच्या वेळा याचे कटाक्षाने नियमन ही गरजच आहे. राष्ट्राची संपत्ती आणि कुटुंबाचे आधार, शिवाय घडणारी भावी पिढी अशी पाण्याखाली जावी, हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. म्हणूनच तरुणांनो तुम्ही स्वतःला सांभाळा, कुटुंब आणि देशालाही...










