वाहन सार्वजनिक व्यवस्थेचे असो किंवा खाजगी मालकीचे, त्या वाहनातून जे कोणी प्रवास करणारे असतात, ते वाहन चालकावर पूर्णतः विसंबूनच प्रवास कर...
वाहन सार्वजनिक व्यवस्थेचे असो किंवा खाजगी मालकीचे, त्या वाहनातून जे कोणी प्रवास करणारे असतात, ते वाहन चालकावर पूर्णतः विसंबूनच प्रवास करीत असतात. अनेक वेळा तो आमचा फक्त ड्रायव्हर आहे, अशी निम्नस्तरीय भावना त्या वाहनात प्रवास करणाऱ्यांची असते. काहीजण अपवादात्मक स्थितीत त्या चालकाला आपल्यातलाच घटक मानतात. मात्र असा प्रकार अगदीच क्वचित आढळतो. याउलट त्या चालकाने वाहन वेगात हाकावे. गर्दीच्या प्रसंगीही आपले वाहन पुढे न्यावे. वारंवार अमूक इतका वेळ झाला, इतके वाजले असे त्या चालकाला ऐकवून तणाव निर्माण करतात. ट्रक, टेम्पो किंवा खाजगी बस मधून तरुणवर्ग प्रवास करीत असेल तर गोंधळ, मस्ती, झालंच तर मद्यपान करणे, चालकाने त्यात सामील व्हावं असं वाटणं यामुळे होणारे अपघात अधून मधून घडलेले दिसतात. वाहन चालविणे एकाग्रतेचे काम असते. त्याची एकाग्रता व सामान्य प्रकृती बिघडणार नाही याची खरंतर काळजीचं घ्यायला हवी असते. ही झाली खाजगी वाहनांची व त्यांच्या चालकांची गोष्ट. राज्य परिवहन महामंडळ आणि तत्सम वाहन व्यवस्थेतील वाहन चालकांच्याही शारिरीक व मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले गेलेच पाहिजे. काल सोमवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आवळी गावाजवळ एस.टी.बसचा अपघात झाला होता. हा अपघात चालकाला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला. छातीत कळ आणि तोंडातून फेस येत असतांनाही बसमधील 45 प्रवाशांचा जीव वाचवण्याच्या हेतूने चालकाने रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या लिंबाच्या झाडावर बस घातली. या प्रकारात बसमधील काही जण आतल्या आत आदळल्याने काही प्रमाणात जखमी झाले. मात्र सर्वच्या सर्व म्हणजे 45 जण बचावले. अर्थात याच आणि तत्सम प्रकारे आजवर अनेक अपघात झाले. त्यात अपवाद सोडला तर जवळपास सर्वच चालकांनी प्रवाशांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता. अशा अवस्थेत या व्यवस्थेत असणारे वाहन चालक यांच्या प्रकृतीस्वास्थ्याचा विषय ऐरणीवर येतो. अलिकडच्या काळात महामंडळ बस चालकाला हृदय विकाराचा झटका येणे, रक्तदाब वाढणे यासारख्या घटना वरचेवर घडतांना दिसतात. एखादी घटना घडल्यावर चार-दोन दिवसानंतर प्रसंग विस्मरणात जातो. म्हणूनच हा विषय काळजीचा विषय होतोय. वाहक-चालक किंवा महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी उपचाराचे मार्ग असतील किंवा उपचारार्थ मदतीची सोय, वेलफेअर फंड, रजा अशा तरतुदीही असतील. पण त्यामुळे प्रश्नाचे निराकरण होते असे जर कोणास वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. नियमितपणे किमान त्यांच्या शरीरप्रकृतीची तपासणी व्हायला हवी. तपासणी अहवालाप्रमाणे उपचार अथवा विश्रांती त्यांना मिळायला हवी. प्रत्येकाचे कामाचे तास, प्रवासाचा पल्ला यांचेही योग्य नियोजन व्हायला हवे. तसेच प्रवास किंवा कामाच्या बदल्यात पगार दिला की जबाबदारी संपली असे असू नये. याचसोबत अवैध प्रवासी वाहतूकदारांशी या ना त्या कारणाने होणारा संघर्ष त्यांचे मानसिक संतुलन बिघडवू शकतो यावरही विश्वास ठेवायला हवा. हा कर्मचारी शरीर व मनाने तंदुरुस्त असला पाहिजे. याविषयी दुमत असायचे कारण नाही. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनीही त्यांचा उपयोग फक्त संघटनेच्या अस्तित्वासाठीच घेऊ नये तर त्यांच्या हीतकारक अवस्थेसाठी प्रयत्नशील असायला हवे. सेवाभावी किंवा सामाजिक संघटना अथवा संस्थांनीही, जशी अन्य पातळीवर आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात तशीच ती कधीतरी या कर्मचाऱ्यांसाठीही करुन सुरुवात करुन द्यावी. नियमित प्रकृती तपासणीमुळे मनुष्यबळ वाचणार आहेच. पण संसार उघड्यावर पडण्याच्या प्रमाणालाही आळा बसेल. त्याचसोबत माणसाने माणसाची घेतलेली काळजी या न्यायाने खरी माणुसकीही जपली जाईल. उगाच घडणाऱ्या घटनांना नशीबाचे लेबल चिटकवण्यात काय हशील आहे? हा प्रश्न आहे. त्यांच्या जीवाची काळजी घेतली जावी हे उत्तमच. प्रवासी संघटनांनीही आपल्या कामाच्या यादीत अशा मागण्यांचा समावेश करायला हरकत नाही. अशा प्रकारे मृत्युमुखी पडणारांचे प्रमाण लक्षणीय नसले तरी, असे का होते हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्याचे उत्तर म्हणजे वाहन चालकांची काळजी घेणे ही गरज आहे, हे होय.
सॉलोमन गायकवाड
संपादक, एलएसएसन्यूज24
अहमदनगर










