नगर:-सध्याच्या धावत्या युगात पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. चुल आणि मुल या पारंपारिक बंधनात न अडकता महिलां...
नगर:-सध्याच्या धावत्या युगात पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. चुल आणि मुल या पारंपारिक बंधनात न अडकता महिलांनी विविध सामाजिक कार्यात घर व नोकरी सांभाळून हिरीरने पुढाकार घ्यावा, आज अनेक स्त्रीया या समाज कार्यात यशस्वी झाल्या आहेत. उज्वल महिला संस्था अनेक वर्षांपासून महिलांकरीता चांगले उपक्रम राबवून शहरामध्ये सक्रिय मंडळ आहे. आज स्नेहसंमेलनात 40 ते 70 वयाच्या महिलांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अंकशास्त्र तज्ञ सौ.मनिषा नेहतराव यांनी केले.
आगरकर मळा येथील उज्वल महिला संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सौ.नेहतराव यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा, माजी उपमहापौर गितांजली काळे यांनी त्यांचा सत्कार केला. या स्नेहसंमेलनानिमित्त मंडळाच्या महिला सदस्यांनी गणेश वंदना, भारुड, लावणी, गायन, आसामी नृत्य, विडंबन गित, रिमिस नृत्य, अशा विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मोठी दाद मिळविली. या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त सहभागी महिलांनी पारंपारिक वेशभुषा परिधान केली होती. यावेळी उद्घाटक सौ.नेहतराव यांनी अंकशास्त्राबद्दल सविस्तर माहिती देऊन आपल्या जन्मतारखेतील अंकाच्या जादूने आपण आपल्या आयुष्यात कशी जादू करु शकतो, याबाबत माहिती दिली.










