अहमदनगर - नगर तालुक्यातील वाळकी या गावास भारत निर्माण योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यानुसार सन 2008 मध्ये वाळकी...
अहमदनगर - नगर तालुक्यातील वाळकी या गावास भारत निर्माण योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यानुसार सन 2008 मध्ये वाळकी गावातील जळवाडी, कासार मळा, आमरवाडी, सुपेकर वस्ती, शिरकानड मळा, मातंग वस्ती या वाडी वस्ती भागात 4,5,6 इंची क्षमतेचे पीव्हीसी पाईप बसविण्यात आले होते.
त्यावेळी झालेल्या काही आरोपांमुळे सन 2009 मध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. असे असता या योजनेअंतर्गत बसविलेले पाईप उकरुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. हा प्रकार सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असता या कृत्यामुळे न्यायालयाचाही अपमान झालेला आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या परवानगीशिवाय घडलेले हे कृत्य फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे.
सदर पाईप लाईन ही 4 ते 5 कि.मी.ची आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. यास्तव संबंधीत प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हेगारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे पत्र अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. याशिवाय जिल्हा पोलिस प्रमुख जिल्हाधिकारी पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. हे पत्र नगर पंचायत समितीचे माजी सभापती रंगनाथ निमसे यांनी पाठविले असून पत्रावर अन्य सदस्यांचीही स्वाक्षरी आहेत.









