प्रतिवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिलादिन जगभरात साजरा केला जातो. संपूर्ण वर्षभर आपण जवळपास रोजच कोणता ना कोणता दिवस विविध पातळीवर साज...
प्रतिवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिलादिन जगभरात साजरा केला जातो. संपूर्ण वर्षभर आपण जवळपास रोजच कोणता ना कोणता दिवस विविध पातळीवर साजरा करतो. पण नंतर त्याचे विस्मरण होते. महिलांच्या बाबतीत मात्र आपण सजग असणे हेच हिताचे आहे. महिलादिन ही प्रथा होवू नये, त्यात यांत्रिकीकरण असू नये. तर ती जाणिवेची संकल्पना असावी हेच योग्य आहे. बदलत्या जगाच्या परिस्थितीत अधिभौतिक संशोधन, विज्ञानाचा व ज्ञानाचा वाढता प्रसार, सामाजिक व कौटुंबिक स्थित्यंतरे, बदलती राजकीय आणि धार्मिक समीकरणे, संस्थात्मक रचना या सगळ्या पार्श्वभूमीवर महिलांचे स्थान आणि सहभाग यांचा शोध महत्वाचा ठरतो. मुळात त्याची सुरुवात ही कुटुंबातून होते. काही कुटुंबात पुरुष वर्चस्व तर काही कुटुंबात स्त्री वर्चस्व, क्वचित काही कुटुंबात समानतेचे वातावरण असते. हीच खरी अडचण आहे. स्त्री-पुरुष एकमेकास पुरक असतात. कोणीही एकजण अपूर्णच ठरतो. म्हणूनच सहजीवनाची संकल्पना प्रत्यक्षात असणे गरजेचे ठरते. अर्थात केवळ पुरुषांनीच याचे स्मरण ठेवावे असे नाही तर स्त्रियांनीही ते ठेवणे गरजेचे आहे. पुरुषांकडून अत्याचाराच्या बातम्या आम्ही रोजच पाहतो, याचा अर्थ स्त्रियांकडून पुरुषांवर अत्याचार होतच नाहीत असे नाही. अन्यथा स्त्रिकडून होणाऱ्या अत्याचार विरोधात पुरुष संघटनांचा उदय झालाच नसता. अत्याचार या शब्दामध्ये केवळ लैंगिक संदर्भ नाही. स्त्रियांची सर्वात मोठी शत्रू स्त्रिच आहे असे अनेकवेळा उध्दृत होते आणि त्यात तथ्य नाही असे धाडसानेच म्हणावे लागेल. एखाद्या महिलेला मूल होत नसेल तर, तसेच लागोपाठ मुलगीच जन्माला आली तर, अशाच अनेक प्रसंगात एका महिलेकडून दुसऱ्या महिलेला जे ऐकावे लागते, जे सोसावे लागते ते सहनशिलतेचा अंत पाहणारे असते. आपल्या आईला आपल्या भावाने सांभाळावे, सुनेने सेवा करावी अशी अपेक्षा राखणारी, आपल्या नवऱ्याला मात्र त्याच्या आईपासून तोडून स्वतंत्र संसार थाटणारी, 'ती' सुध्दा एक महिलाच असते. अशा प्रकारच्या अनेक घटनात एक स्त्री दुसऱ्या स्त्रिच्या दुःखास किंबहुना अपमानास कारण ठरते. समाज संकल्पनेचा आणि अभ्यासकांचाही हा दावा आहे. बदल जर हवा असेल तर त्याची सुरुवात इथेच व्हायला हवी. एकदा कुटुंबामध्ये सहजीवन, सन्मान या गोष्टी जन्माला आल्या की, सामाजिक जीवनातही त्या सक्षम होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन आपल्या परीने प्रयास करते
आहेच. त्यासाठी अगदी शासन-प्रशासनातील त्यांचा सहभाग विविध कारणे करुन वाढवित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, बँक, उद्योग, शिक्षण, आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रात उत्तम संधी निर्माण करुन दिल्या जातात. त्याचा लाभ हा क्षमतेने घेतला गेला पाहिजे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा सहभाग असला तरी, कारभार त्यांचे पती करतात अशी तक्रार कधी कधी ऐकायला येते. खरंतर अशा गोष्टी घडू नयेत. त्यांना मिळालेल्या संधीचा उपभोग त्यांनाच घेऊ दिला पाहिजे. चुकला एखादा निर्णय तर त्याच अनुभवातून त्या शिकणार आहेत. धर्म, रुढी, परंपरा, संस्कृती आणि स्त्री यांचे नातच अतूट असं आहे. नव्हे या गोष्टी स्त्रियांच्यामुळेच प्रभाव टिकवून आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये. मात्र अशा घटकांतून तिलाच हद्दपार करण्याचा प्रयत्न करणं, किंबहूना दूर ठेवायचा प्रय़त्न होणे योग्य नाही असे वाटते. श्रध्दा, भक्ती जोपासणे हे जणू स्त्रियांचेच परम कर्तव्य आहे. ही अपेक्षा होत असतांनाच तिच्यातल्या श्रध्दा व भक्तीला कुंपण घालण्याचं काम होत असेल तर त्याचं समर्थन कसं करायचं, हा प्रश्न आहे. एकीकडे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आजची स्त्री जगते हे सांगितले जात असतांना, कुटुंबात तिच्या विचारांची दखल, कुटुंबातील अन्य स्त्रिया व पुरुषांकडूनही घेतली न जाणे हा विरोधाभास आहे. एकीकडे महिला दिनाचा जागर घातला जात असतांनाच, विविध पातळीवर विविध घटकांकडून महिला "दीन" तर ठवल्या जात नाही ना? याचाही विचार व्हायला पाहिजे. प्रगत समाजाच्या संकल्पनेत प्रगत स्त्री अनिवार्य ठरते. जगात काही अनिष्ठ घटना स्त्री संदर्भात घडतात म्हणून सर्वांना एकाच नजरेने पाहण्याचे कामही स्त्रिकडून होऊ नये. प्रत्येक स्त्रिने प्रथम स्वतःला सन्मानास योग्य समजावे, मी दीन, दुबळी हा विचार टाकावा, आपल्या अधिकाराप्रती जागृत व्हावे,
स्वतःच्या ज्ञानकक्षा रुंद कराव्यात. मन आणि शरीराचे आरोग्यही सांभाळावे. इतरांनी या कामी तिला सहाय्य करावे. हे घडेल तो प्रत्येक दिन महिला दिनाचा सन्मान करणारा असेल.










