पारनेर - चातकाप्रमाणै वाट पाहणाऱ्या पारनेरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. संपूर्ण तालुक्याचे गेल्या 4 महिन्यांपासून लक्ष लागलेल्या कुक...
पारनेर - चातकाप्रमाणै वाट पाहणाऱ्या पारनेरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. संपूर्ण तालुक्याचे गेल्या 4 महिन्यांपासून लक्ष लागलेल्या कुकडीच्या आवर्तनाचे पाणी निघोज, वाडेगव्हाण पट्ट्यात पोहचल्याने या पट्यातील 12 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळाला आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजता येडगाव धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी तब्बल चार महिन्यांनंतर पारनेर तालुक्यातील 14 गावासह श्रीगोंदा कर्जत करमाळा तालुक्यात पोहोचणार असल्याने पारनेर तालुक्यासह अन्य तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे.
सध्या सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी विकत्या पाण्यावर फळबागा जगवत आहेत. त्यामुळे कालवा फोडणे किंवा थेट पाईप टाकण्याचे प्रकार होण्याची शक्यता आहे, हे गृहित धरुन जिल्हाधिकार्यांनी सर्व तालुक्यांत पोलिस बंदोबस्तात पाणी नेण्याचे नियोजन केले आहे. आवश्यक पोलिस कर्मचारी देण्याच्या सूचना पोलिस अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
रविवार (दि. 17) रोजी सायंकाळी 8 वाजता निघोजमध्ये आवर्तन पोहोचले.आवर्तन फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले असून, पाणी चोरी रोखण्यासाठी राज्य राखीव दल नियुक्त करण्यात आले आहे. शेतीपिकांना पाणी उचलू नये; अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी लावल्या आहेत. शनिवारी येडगाव धरणातून 700 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा लाभ पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे. हे आवर्तन 5 मे पर्यंत सुरू राहणार आहे. कुकडी डावा कालवा हा 249 किमी लांबीचा आहे. हे आवर्तन सुटल्याने पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव, यादववाडी, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, कोहोकडी, राळेगणथेरपाळ, कुरूंद, म्हसे, जवळा, निघोज यांसह अन्य गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे निघोजचे सरपंच ठकराम लंके, बाबाजी लंके, पाडळी रांजणगावचे सरपंच वैशाली करंजुले, उपसरपंच विक्रमसिंह कळमकर, यादववाडीचे सरपंच मंजुळा शेळके, वाडेगव्हाणचे सरपंच संध्या शेळके यांनी सांगितले.










