गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराने ५२६ वर्षांची वाटचाल पूर्ण गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराने ५२६ वर्षा...
गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराने ५२६ वर्षांची वाटचाल पूर्ण केली़ सोळाव्या आणि सतराव्या शतकात भारतातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नगरचा मोठा नावलौकिक होता़ निजामशाहीत वैभवशाली राजधानीचे शहर म्हणूनही नगर ओळखले जायचे़ गेल्या पाच शतकांच्या कालखंडात या शहराने अनेक राजे, महाराजांचा, शाही, पेशवाई आणि इंग्रजांचा काळ आपल्या उदरात सामावून ठेवला आहे़ या ऐतिहासिक वैभवाची आठवण करून देणाऱ्या जुन्या वास्तू आणि स्थळे या शहरात आजही जीर्ण अवस्थेत उभी आहेत़स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात केवळ राजकीयच नव्हे तर लष्करी, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही या शहराने लौकिक मिळविला़ गेल्या ३० ते ३५ वर्षांत मात्र, या शहराचा अपेक्षित असा विकास झाला नाही़ इतिहासाचे सिंहावलोकन करताना मधला काळ शहरासाठी ठप्पच राहिला असेच शहराच्या स्थापना दिनानिमित्त म्हणावे लागते़अहमदनगर हे स्थापना दिन साजरा करणारे राज्यातील कदाचित एकमेव शहर असावं! ५२५ वयाचे हे शहर आजही शहरवासीयांकडे आपली ओळख शोधत आहे. याला आम्ही नगरकरच कारणीभूत आहोत का? यावर मंथन होणे गरजेचे आहे़ माझ्या वाढदिवसाइतकाच किंबहुना त्यापेक्षाही माझ्या शहराचा वाढदिवस महत्वाचा व्हायला हवा असे एक कलावंत म्हणून मला नेहमी वाटते.
नगर शहराची वेगळी ओळख सांगता येईल असा भुईकोट किल्ला, फराह बक्श महल , हस्त-बेहस्त बाग , चाँदबिबी महाल, हत्ती बारव, अशा ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहेत़ या वास्तू एकमेवाद्वितीय आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही दुसरी चाँदबिबी झालेली नाही व कुठेही चाँदबिबीचा महाल नाही. सपाट पठारावर अभेद्य भुईकोट किल्ला बांधणारा अहमदशहा जगात दुसरा नाही, पण असे असूनही आजही आमच्या या पूर्वजांचा आम्हाला सार्थ अभिमान नाही. हा वारसा जपण्याची, वेगवेगळ्या मार्गाने हा वारसा जगभरात पाठवण्याची तळमळ नाही. या वास्तुंचे जतन, संवर्धन, व प्रसिध्दीसाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक प्रयत्न होताहेत पण या प्रयत्नांना शासकीय पातळीवरून अपेक्षित प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे़ शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तुंची डागडुजी होणे गरजेचे आहे तर काही ठिकाणी परिसर सजावटीची गरज आहे. सर्वच वास्तुंची प्रसिध्दीही होणे गरजेचे आहे. या वास्तुंपर्यंत जाण्यासाठी कायमस्वरूपी अथवा ठराविक वारी वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. या विविध वास्तुंची माहिती, महत्व सांगणाऱ्या पुस्तिका, मार्गदर्शिका करून द्यायला हव्यात. शासकीय पातळीवर ही बाजू सावरली तरी आपल्या शहराचा अभिमान बाळगणाऱ्या नगरकरांची आपली भूमिका महत्वाचीच आहे










