'सुरळीत पाणी पुरवठय़ासाठी अखंडित वीज द्या'; अहमदनगर ; सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झा...
'सुरळीत पाणी पुरवठय़ासाठी अखंडित वीज द्या';
अहमदनगर ;
![]()
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला पदाधिकार्यानांच सामोरे जावे लागत आहे. काय दुरुस्ती करायचीय ती एकदाच करुन घ्या. पाणी असूनही केवळ महावितरणमुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन या मार्गावरील वीज वितरणमधील तांत्रिक दुरूस्ती तातडीने करुन वीज पुरवठा सुरळीत करा, अशा शब्दात महापौर सुरेखा कदम यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना खडसावले आहे.
महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महावितरणच्या अभियंत्यांशी चर्चा करण्यासाठी महापौर कदम यांनी सोमवार, दि. १ थेट महावितरणचे कार्यालय गाठले. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, सचिन जाधव, दिलीप सातपुते, दिगंबर ढवण, महेश तवले, सागर बोरुडे, बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, योगिराज गाडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांच्याशी चर्चा केली. वीज पुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन पाणी उपसा अनियमित झाला आहे. शहरासाठीच्या वितरण टाक्या भरता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करता येत नाही. मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन भागातील तांत्रिक बिघाड त्वरित शोधावा, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
|










