'विकास कामाच्या जोरावरच मते मागायला येणार' ; अहमदनगर नगर - श्रीगोंदा मतदारसंघातील जनतेने मोठा विश्वास माझ्यावर दाखवून मला आ...
'विकास कामाच्या जोरावरच मते मागायला येणार' ;
अहमदनगर
नगर - श्रीगोंदा मतदारसंघातील जनतेने मोठा विश्वास माझ्यावर दाखवून मला आमदार केल्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरवत भरीव असे विकासकामे करून पुन्हा एकदा कामाच्या जोरावरच मते मागायला येऊ, असे प्रतिपादन आ. राहुल जगताप यांनी केले आहे. नगर तालुक्यातील कौडगाव (जांब) येथील लक्ष्मण महाराज यांच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोज़ित हरिनाम सप्ताहास भेट दिली असता ते बोलत होते. या वेळी ज्ञानेश्वर महाराज कराळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. या वेळी आ. जगताप म्हणाले, नगर- श्रीगोंदा तालुक्यातील जनता भाविक आणि श्रद्धाळू आहे. प्रत्येक गावात भरीव अशी विकासकामे करून गावची वेगळी ओळख निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. कौडगावमध्ये सुमारे पस्तीस लाख रुपयांचा निधी दिला आहे, असे म्हणत पुढच्यावर्षी सपत्नीक सप्ताहाच्या कार्यक्रमाला येऊ. शेतकर्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही आणि पुढार्यांच्या मुलांना तर अजिबातच नाही, असे म्हणून आ. जगताप यांनी यावर्षात विवाहबद्ध होण्याचे संकेत दिले आहेत.
या वेळी युवानेते अक्षय कर्डिले म्हणाले, आ. जगताप यांचे मतदारसंघात चांगले काम सुरू असून, यापुढे तरुणांनी आध्यात्मिक क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या वेळी बाजीराव हजारे, युवानेते दीपक लांडगे, बंडू पाठक, रभाजी सूळ, बन्सी कराळे, अनिल करांडे, सरपंच प्रकाश पालवे, पोपट चेमटे, मिरी - तिसगाव प्रादेशिक नळयोजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाप्रसादाची पंगत सार्थक खर्से यांनी दिली. बाबापाटील खर्से, धनंजय खर्से, बाळासाहेब बिबे, रमेश सिंगाडे, राजेंद्र गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
माजी जि. प. सदस्य बाबापाटील खर्से आणि जि. प. सदस्य बापुसाहेब सदाफुले यांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जुगलबंदी झाली. तसेच आ. जगताप यांनी लवकरच विवाह उरकावा, असे कौटुंबिक आवाहन खर्से यांनी करताच आ. जगताप यांनी त्यांना दाद देत पुढच्यावर्षी सपत्नीक येईल, असे स्पष्ट केले.









