माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा, प्रकल्प राबविणार अहमदनगर : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ...
अहमदनगर : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येत्या सोमवारपासून जिल्ह्यात माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा, प्रकल्पास सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनी सोमवारी येथे केली़
स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर राम शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ खा़ दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महापौर सुरेखा कदम, प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर आदी यावेळी उपस्थित होते़
देशभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे़ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत महाभियान हाती घेण्यात आले आहे़ या अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हे राज्यव्यापी संपर्क अभियान येत्या २२ आॅगस्टपासून हाती घेण्यात येणार आहे़
या पार्श्वभूमीवर माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा, हे अभियान हाती घेवून जिल्ह्यातील शौचालये नसणाऱ्या कुटुंबाना भेटी देवून शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले जाणार आहे़ हा प्रकल्प जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, सर्व शासकीय यंत्रणा अभियानात सहभागी होणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले़
सरकारने नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत येत्या १ सप्टेंबरपासून राज्यभर महाअवयदान अभियानही हाती घेण्यात येणार आहे़ राज्यातील १२ हजारांहून अधिक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत़ गरजू रुग्णांना अवयव उपलब्ध व्हावे, यासाठी ही महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आह़े़ ही योजना जिल्हा, तालुकास्तरावर राबविण्यात येणार असून, अवयवाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे़ सर्व शासकीय यंत्रणांकडून अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले़










